Monday, December 21, 2015

शुभमंगल करताना जरा "सावधान'




प्रत्येक वर व वधूच्या आयुष्यातील शुभविवाह हा एक मंतरलेला क्षण असतो. लग्नाच्या या रेशीमगाठीत अडकताना अथवा बोहोल्यावर चढताना यौवनावस्थेतील भिरभिरणारं हे तरुण तन व मन एकमेकांच्या प्रेमालाप, सहवासासाठी आणि मिलनासाठी आसुसलेलं असतं. हा क्षण म्हणजे प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यातील एक नाजूक टप्पा, की ज्या क्षणांसाठी त्यांनी लग्नाच्या बेडीत अडकताना नानाविध रंगीबेरंगी स्वप्नं पाहिलेली असतात.
 
लग्न म्हणजे वयात आलेल्या प्रत्येक मुलामुलीच्या जीवनातील एक अत्यंत नाजूक वळण किंवा टर्निंग पॉइंटच म्हणू या. फुलपाखरी स्वच्छंदी जीवन अनुभवल्यानंतर घरात मुलामुलीच्या लग्नाचा विषय निघतो. आपल्या मुलाला अथवा मुलीला सुयोग्य जोडीदार निवडताना बऱ्याच पालकांची तारेवरची कसरत होत असते. नाना तऱ्हेचे शेकडो उपाय केले जातात, लग्न जमविण्यासाठी कुंडलीची जुळवाजुळव केलेली असते, आपल्या सोन्यासारख्या मुलासाठी अथवा मुलीसाठी पाहुण्या-राऊळ्यांचे उंबरे झिजवलेले असतात. अर्थातच विवाहाच्या या उंबरठ्यावर आपल्याला मनासारखाच जोडीदार मिळावा, अशी प्रत्येक मुलामुलीची मनोमन इच्छा असते. 

 
असा सुयोग्य व परिपूर्ण जोडीदार निवडताना सावधानता बाळगणंही महत्त्वाचं ठरतं. प्रथमतः आपण आपला मुलगा असो अथवा मुलगी, तिचं किंवा त्याचं लग्नाचं जरी वय झालं तरी त्यांच्यात सुखी व आनंदी संसार करण्याची बौद्धिक कुवत आली आहे की नाही, हे पाहणंही गरजेचं आहे. आपले नातेसंबंध, नातीगोती, स्वभाव, मित्रपरिवार, शिक्षण, राहणीमान आणि अत्यंत महत्त्वाचं म्हणजे आपली आर्थिक मालमत्ता व कौटुंबिक स्थितीचं ज्ञान असणं गरजेचं आहे. काही वेळा काही मुलामुलींना शारीरिक आजार, व्यंग अथवा आनुवंशिक शारीरिक त्रास असतो. घरची मंडळी तो कळू देत नाहीत, त्यासाठी लग्नापूर्वी रक्तगट व आरोग्यतपासणी करून घेणं गरजेचं असतं; परंतु आपल्या अपेक्षेप्रमाणं योग्य आणि आपल्याला साजेसा जोडीदार मिळणं तसं अवघडच असतं. त्यामुळं कुठंतरी तडजोड होतेच. जोडीदाराच्या बाह्यसौंदर्य किंवा आर्थिक मिळकतीपेक्षा तो किंवा ती प्रापंचिक जबाबदारीस पात्र आहे की नाही, त्याबद्दल चौकशी करून अत्यंत शांतपणे, समंजसपणे आणि कोणत्याही प्रकारची घाई न करता निर्णय घ्यायला हवा.
पालकांनीही थोडीशी जागरुकता दाखवून आपल्या मुलामुलींबद्दल जास्त अपेक्षा बाळगू नयेत, मानापानाच्या नावाखाली अवाजवी मागण्या करू नयेत. हुंडा देणं व घेणं कायद्यानं गुन्हा आहे, याची जाणीव ठेवावीच. "चट मंगनी पट शादीया उक्तीप्रमाणं पालक जबाबदारीतून मुक्ती मिळण्यासाठी साखरपुड्यातच लग्न लावून देतात किंवा "पाहायला म्हणून आले आणि लग्न लावून गेले,‘ अशा काही गोष्टी धोकादायक ठरतात. आपल्या गुणी अपत्यांचा संसार सुखी होण्यासाठी मुलाची अथवा मुलीची सवय, स्वभाव, वर्तणूक, शारीरिक आजार आणि वयातील अंतर इत्यादी महत्त्वाच्या गोष्टी माहीत करून घेणं गरजेचं आहे. कोणत्याही प्रलोभनांना बळी न पडता, भावनांच्या आहारी न जाता, आपलं कुटुंब व समाज यांचा विचार करून अनुकूल व सुयोग्य शरीराची व मनाची परिपक्वता झाल्यावरच लग्नासाठी आपण होकार द्यावा आणि मगच प्रेम व स्नेहरूपी अक्षता हळदीच्या अंगावर पाडून घेत म्हणावं... "शुभमंगल सावधान"... 

 

विवाहासाठी सहभाग मुला-मुलींचा विवाह ठरविण्याच्या सध्याच्या पद्धतीत प्राथमिक निवड मुला-मुलींचे पालक करतात. पत्रिका पाहणे, फोटो इत्यादी गोष्टी पालकच करतात. मुलांचा किंवा मुलींचा प्रत्यक्ष सहभाग पाहण्याच्या कार्यक्रमावेळीच येतो. आजकालच्या धावपळीच्या युगात हे सर्व करायला मुला-मुलींना वेळ नसतो. कारण त्यांचे सर्व लक्ष करिअरकडे असते. पण यामुळे होते काय, की आई-वडिलांना योग्य वाटतात तेवढीच स्थळे निवडली जातात. मुला-मुलींच्या अपेक्षांबद्दल त्यांना कल्पना असतेच असे नाही. त्यामुळे थोडासा विसंवाद होण्याचा प्रकार घडतो. मुला-मुलींचे पर्याय पालकांच्या चष्म्यातून गाळलेले असल्याने ते मुला-मुलींना भावतातच असे नाही. त्यामुळे पाहण्याचे कार्यक्रम होऊनही पसंती होत नाही. खरे तर मुला-मुलींनी लग्न ठरविणे ही पालकांइतकी स्वतःची जबाबदारी मानायलाच हवी. कारण अधिकाधिक मुले-मुली पुढे येऊन स्वतःचा जीवनसाथी निवडण्यात सुरवातीपासून सहभागी होतील, तेव्हा योग्य प्रकारे निवड होऊ शकेल. कारण आयुष्यभर एकत्र राहण्यासाठी नुसते प्रेमच नव्हे, तर मनेही जुळावी लागतात, विचार एकमेकांशी मिळते असावे लागतात, तडजोडीची तयारी लागते. परस्परांच्या सुखासाठी काही गोष्टींचा त्याग करावा लागतो. सहजीवन तर सुंदर असतेच; पण स्वतःचा व्यक्ती म्हणूनही विकास तितकाच महत्त्वाचा असतो.

आपलं माणूस विवाहसंस्था आपल्या त्वरित शुभ-विवाहाची आणि सुखद सह-जीवनाची कामना करते.


सुयोग्य जोडीदाराच्या निवडीसाठी....
आजच नाव नोंदवा : www.apalamanus.com
 

ग्राहक सेवा क्रमांक:  98-606-82-967 आणि 738-7171-483
वेळ: स. 10 ते सायं 6 | रविवार सुरु



आमचा ब्लॉग वाचा : http://apalamanusvivahsanstha.blogspot.in/ 

फेसबुक पेज लाईक करा : https://www.facebook.com/apalamanusvivahsanstha 

गुगल ग्रुप जॉईन करा :
 https://groups.google.com/forum/#!forum/apalamanus

Thursday, September 10, 2015

लग्न ठरविण्यापूर्वी मुलींनी कोणती काळजी घ्यावी?

शिक्षण पूर्ण झाल्यावर व काही मुली करियर नीट सेट झाल्यावर लग्नासाठी जेंव्हा स्थळे बघायला लागतात तेंव्हा प्रत्येकीलाच लग्न ठरविण्यासाठी तपासून, पारखून घ्यावयाच्या गोष्टींची माहिती असतेच असे नाही. बरेचदा, प्रथमदर्शनी स्थळ प्रभावी वाटते; कधी आजबाजूच्या, घरच्या वा नातेवाइकांचा दबाव येतो. असा दबाव प्रत्यक्ष जरी लक्षात येत नसला तरी असे स्थळ शोधूनही सापडणार नाहीअशी स्तुतिसुमने मुलींना, कधी त्यांच्या पालकांना पुढची पाऊले उचलण्यास भाग पडतात.


असे अनेक विवाह, हे पूर्ण स्थिर, शांत विचार करूनच ठरविले जातात ह्याची खात्री देता येत नाही. मग लग्नानंतर दोन्ही कुटुंबांचे, जोडीदाराचे अनेक रुचणारे-टोचणारे पदर समोर उलगडत जातात आणि मग वाटते, “पसंती कळविण्यापूर्वी ह्याचा थोडा विचार केला असता तर आज ही वेळ आली नसती”. पण त्यावेळी घाई होऊन गेलेली असते. "मुलगा इतक्या चांगल्या कंपनीत आहे, मोठे भक्कम पॅकेज आणि पुण्यात/ठाण्यात स्वतःचा फ्लॅट ही आहे हो.परंतु यशस्वी, आनंदी संसारासाठी केवळ ह्या भौतिक वा दृश्य सुख-साधनेच पुरेशी नसतात हे घटस्फोटाचा अर्ज करणारे जोडपे कळकळीने सांगते. परंतु आज नवल ह्याचे आहे की खूप चांगल्या इंजिनिरिंग कॉलेजमधून BE झालेल्या वा प्रतिष्ठीत इंस्टीट्युटमधून मॅनेजमेंटची पदवी घेतलेल्या मुली आधुनिकतेच्या किंवा आजकालनावाचे लेबल लावून आपल्या विचारशक्तीला बाजूला सारतात.




लग्न अयशस्वी झाल्यानंतर मराठी समाजव्यवस्थेत किंवा भारतात तरी अधिक त्रास होतो तो मुलींनाच. मुलांना त्याची झळ तुलेनेने तितकीच लागेल असे नाही. त्यामुळे मुलींनी कुठलेही स्थळ बघितल्यावर पसंती कळविण्यापूर्वी खाली दिलेल्या बाबींचा अवश्य विचार करावा तसेच, आपलं माणूस विवाहसंस्थेच्या ब्लॉगवर असलेला सुयोग्य जोडीदार म्हणजे नक्की काय?’ हा ब्लॉगही वाचवा. लग्न ठरविण्याच्या ह्या प्रक्रियेमध्ये पालकांच्या असलेल्या अॅक्टिव्ह (सक्रिय) भुमिकेमुळे त्यांनीही शांतपणे काही बाबींचा प्राथमिकतेने विचार करावा.

उच्च-शिक्षित, उच्च मध्यमवर्गातील व सधन कुटुंबातील मुली अमेरिका किंवा UKच्या मुलांशिवाय पर्याय नाही अशा समजुतीत असतात किंवा त्यामुळेच इतकं शिकल्याचाकाही उपयोग आहे, वगैरे अशा विचारांत असतात. अर्थात, त्यात गैर काहीच नाही परंतु अशा वेळी थोडी अधिक सावधगिरी बाळगली की पुढचा मार्ग सुखकर होतो. अॅब्रॉडचा मुलगा बघताना त्याच्या सर्व बाबींची माहिती व त्याची सत्यता तपासण्यासाठी कागदपत्रे मागताना 100% संकोचल्यासारखे किंवा अवघड वाटते खरे पण हा संकोच, नंतर दुर्दैवाने घटस्फोटासाठी वकील शोधताना होणाऱ्या जीवघेण्या अस्वस्थेतेपेक्षा केंव्हाही कमीच ठरतो. शेवटी प्रश्न आपल्या (किंवा आपल्या मुलीच्या) उभ्या आयुष्याचा  असतो. दरवेळी अगदी टोकाचा त्रास वा फसवणूक होईलच असे अजिबात नाही. परंतु ती व्यक्ती, त्याचे आर्थिक व्यवहार, परदेशातील नोकरीतील सत्यता, इतर वर्तन, व्यसनाधीनता ह्याबाबत  केलेली सखोल चौकशी निश्चितच व्यर्थ जात नाही. आणि ह्याचा आपलं माणूस विवाहसंस्था अतिशय आग्रहाने सल्ला देते. अहो, अमुक-अमुक ह्यांनी सांगितले आहे म्हणजे खोटे का असणार आहे? ती माणसे तशी नाही वाटत बरं का...अशा समजुतीवर आपल्या सुशिक्षित विचारक्षमतेने निर्णय घ्यावा.

परदेशातील फसवणुकीची स्थळे उघड होण्याचे प्रमाण बहुतांश कॉर्पोरेट स्वरूपाच्या अ-मराठी विवाहसंस्थांकडून अतिशय जास्त आहे. त्यामुळे मराठी माणसांनी तरी शक्यतोवर मराठी स्वरूपाच्या विवाह्संस्थांमध्ये नोंदणी करावी.

अशा आणि एकूणच सर्व प्रकारच्या वर-संशोधनात काय काळजी घ्यावी? कुठल्या गोष्टींची खातरजमा करावी? अवश्य तपासण्याजोग्या बाबी कुठल्या? इत्यादींचा मुलींनी व त्यांच्या पालकांनी आपल्या अपेक्षेनुसार मिळालेल्या स्थळांविषयी विचार करताना मुख्यत्वेकरून खालील गोष्टींचा नीट विचार करावा


·       आपल्याल्या सुयोग्य वाटणाऱ्या मुलाशी, मुलीने प्रत्यक्ष भेटून बोलणे अतिशय आवश्यक आहे. लग्न ठरविण्यापूर्वी अशा होणाऱ्या अधिक भेटी त्यांच्या भविष्यातील नात्याचे बंध भक्कम करण्यासाठी प्रचंड उपयोगी असतात. बरेचदा विवाहसंस्थेच्या फॉर्मवरील माहिती/फोटो हे आकर्षकच असते पण प्रत्यक्ष भेटीत अनेक बारकाव्यांचा नकळत खुलासा होतो.

·       त्या मुलाचे आचार-विचार-उच्चार ह्या प्रत्यक्ष भेटीत अनुभवास येणाऱ्या गोष्टी मुलाचे खरे स्वरूप दर्शवितात जे केवळ विवाह्संस्थेतील माहितीवरून किंवा कौटुंबिक भेटीच्या कार्यक्रमातून अभावानेच कळतात.


·       हल्ली कांद्यापोह्यांचे कार्यक्रम पुणे-ठाणे-नवी मुंबई-मुंबई आणि महाराष्ट्रातील प्रमुख शहरातून बंद झाले असले तरी काही ठिकाणी त्याला कौटुंबिक भेटीचे स्वरूप दिले जाते आणि मुला-मुलींना बोलण्यासाठी काही वेळ बाजूला दिला जातो. परंतु तो निश्चितच पुरेसा नाही. त्या दोघांना बाहेर कुठेतरी, ऑफिस-कॅन्टीन किंवा इतर सुरक्षित व सोयीच्या ठिकाणी पण वडिलधाऱ्यांच्या अनुपस्थितीत मोकळेपणाने बोलू दिलेच पाहिजे. अर्थात त्यावेळी काय बोलायचे, कुठले प्रश्न विचारायचे, महत्त्वाचे काय? ह्याची जाण ही सुशिक्षित, मॅच्युअर व सुजाण मुलींना असायला हवी. अशा वेळी आपलं माणूस विवाहसंस्थेसारख्या मार्गदर्शक संस्थांचीदेखील मदत होऊ शकते.

·       ह्या भेटींमध्ये मुलींनी, त्याची शैक्षणिक, कौटुंबिक व व्यावसायिक पार्श्वभूमीची माहिती त्याच्याकडून जनरल चर्चेतून जाणावी. तिच्या लग्नानंतरच्या आर्थिक व इतर भूमिका, त्या मुलाचे त्यावरील मत, तिच्या/त्याच्या कौटुंबिक व आर्थिक जबाबदाऱ्या अशा विषयांवर मुख्यत्वे चर्चा लाभदायीच ठरते आणि समोरील व्यक्तीची चांगली ओळख होते. ही सर्व चर्चा केवळ एकाच भेटीत पूर्ण होतेच असे नाही आणि आपल्याला पुढील किमान 40 वर्षे ह्या  व्यक्तीसोबत, ज्यासोबत आपल्या जन्माचं मानसिक, शारीरिक, आर्थिक सर्वस्व शेअरकरणार आहोत, ज्याला आपल्या मनात, हृदयात सर्वात जवळच स्थान असणार आहे, त्याच्याशी आपली भावनिक नाळ जुळते की नाही हे उमजू लागते आहे, त्या मुलाबाबत निर्णय घेताना 1-2 भेटी अधिक झाल्या तर काही हरकत नाही.

·       मुलींनी खासकरून ह्याचवेळी सावधता बाळगायला हवी कारण अश्या भेटींमधून मुली इंप्रेसकेल्या जाण्याची व मुलींनीही हुरळून जाण्याची दाट शक्यता असते. इथेच आपले शिक्षण, आपले विचार, आपली logical thinking कामी येते. भावना आणि व्यावहारिकता ह्यांचा उत्तम वापर तुमचं, तुमच्या दोन्ही कुटुंबाचं, तुमच्या अपत्यांचं आयुष्य रेशमी बनवणार असतं. तर कधी-कधी ते संकटमय होण्यापासून वाचवताही येऊ शकतं.

·       तुम्ही जेंव्हा अशा भेटी-गाठी घेत असता तेंव्हा काही केसेसमध्ये शक्यता असते की आता कसं नाही म्हणावं?’ अशा दडपणात येण्याची. ह्यावेळी आपण परत मदत घेऊ शकता आपलं माणूस सारख्या विचारी विवाहसंस्थेची. जराही अप्रत्यक्ष/अदृश्य दबाव वा दडपणाखाली न येता तटस्थपणे निर्णय घेण्यात मदत करण्यासाठी/मार्गदर्शनासाठी ही संस्था नेहमीच अग्रेसर असते. तुमचे संपर्क डीटेल्स त्या स्थळाकडे असले तरी त्यामुळे काही विशेष फरक पडत नाही परंतु अशावेळी आपला जो काही निर्णय आहे तो समोरील स्थळाला कळविण्याची नैतिक जबाबदारीही आपल्याकडे असते. आपण आपला निर्णय तर त्या मुलाला स्वतःहून कळवावाच शिवाय तो निर्णय घेण्यात त्याने केलेल्या सहकार्याबद्दल आभारही मानावेत. तेवढे सौजन्य आपल्याकडे सुशिक्षितम्हणवताना असायलाच हवे. त्यासाठी ईमेल, SMS वगैरे ही आधुनिक माध्यमेही खूप चांगली उपयोगी आहेत. कारण बरेचदा आपण थेट 'नाही' सांगायला संकोचतो.


·       आपण त्या मुलाशी भेटून त्याने, त्याच्या घरच्यांनी इ. नी दिलेल्या महितीची त्रयस्थाकडून नीट तपासणी करून घ्यावी. आवश्यक ती कागदपत्रे मागताना संकोच, मन घट्ट करून, बाजूला सारावा. खास करून US, UKकडील मुलांची स्थळे बघताना ही काळजी घ्यावीच.

·       केवळ त्या मुलाची माहितीवर न थांबथा, त्याच्या जवळच्या (घरच्या) नातेवाइकांचीदेखील प्राथमिक माहिती घ्यावी. ह्याचा संबंध आपल्या भावी कौटुंबिक आयुष्याशी असो-नसो, ती माहिती काही केसेसमध्ये आपल्याला उपयोगी ठरू शकते. अर्थात, अशावेळी तो प्रत्यक्ष मुलगा, त्याचे विचार-वर्तन, शिक्षण ह्यालाच महत्त्व द्यावे. केवळ, नातेवाइकांच्या चुकीची नाहक शिक्षा त्या मुलाला देऊ नये. (तो पात्र असल्याची खात्री झाल्यास)


·       पालकांनी काय करावे: आपणांस शक्य असल्यास त्या मुलाच्या घरी जाऊन कौटुंबिक चर्चा करावी, घरातील वातावरण, माणसे ह्यांची ओळख करून घ्यावी. मुलाच्या नोकरीसंदर्भातील माहितीसाठी त्रयस्थांकडून प्रयत्न करावेत, मुलाची वर्तवणूक, व्यसनाधीनता, इतर बाबी ह्याची माहिती प्रत्यक्ष मुलाशी बोलून व इतरांकडून घ्यावी. त्यांच्या घरातील झालेली इतरांची लग्न किती यशस्वी झाली तेही पहावे (अर्थात त्यावरून केवळ अंदाज घ्यावा तेच प्रमाण मानू नये). मुलींना भेटण्या-बोलण्यासाठी पूर्ण मोकळीक द्यावी, निर्णय-स्वातंत्र्य द्यावे. तिचे नकारात्मक मत असेल तर त्याचे कारण जाणून आदर करावा. आपले किंवा नातेवाइकांचे दडपण लादू नये.

अशी व्यवस्थित काळजीपूर्वक केलेली चिकित्सा पुढील आयुष्यातील सर्व काळजी मिटवून निश्चिंत बनविते. अधिक माहितीसाठी आमच्या ब्लॉगवरील सुयोग्य जोडीदार म्हणजे नेमकं काय?” हा लेख शांतपणे वाचवा. लग्न पहावं करूनम्हणण्यापूर्वी लग्न ठरवताना स्थळ पहावं जोखून हे धोरण दोन्ही कुटुंबियांच्या आणि मुला-मुलींच्या सुखकर सह-जीवनाची पायाभरणी ठरेल.



आपलं माणूस विवाहसंस्था आपल्या त्वरित शुभ-विवाहाची आणि सुखद सह-जीवनाची कामना करते.


सुयोग्य जोडीदाराच्या निवडीसाठी....
आजच नाव नोंदवा : www.apalamanus.com


ग्राहक सेवा क्रमांक:  98-606-82-967 आणि 738-7171-483
वेळ: स. 10 ते सायं 6 | रविवार सुरु


आमचा ब्लॉग वाचा : http://apalamanusvivahsanstha.blogspot.in/ 

फेसबुक पेज लाईक करा : https://www.facebook.com/apalamanusvivahsanstha 



गुगल ग्रुप जॉईन करा : https://groups.google.com/forum/#!forum/apalamanus


Tuesday, September 8, 2015

चांगला "लाईफ-पार्टनर" कसा ओळखावा?



लग्नासाठी स्थळं बघणाऱ्या कुठल्याही मुला-मुलींना त्यांना अपेक्षित जोडीदार किंवा ‘सुयोग्य’ लाईफ पार्टनर कसा असावा असं विचारल्यावर बहुतांश जणांची उत्तरं ही समंजस, चांगला असा पार्टनर असावा अशी अपेक्षा असते पण समंजस म्हणजे नेमकं कसा किंवा चांगला कशावरून समजावा ह्याबाबतीत पुरेशी स्पष्टता नसते आणि काही ठराविक गोष्टींवरून अनुमान काढून लग्नाचा निर्णय घेतला जातो. बरेचदा भेटल्यानंतर “माणसं चांगली वाटली” असा निष्कर्ष साधारणपणे लग्नाच्या निर्णयापर्यंत आपल्याला पोहचवितो.

तर मग एखादे स्थळ आपण बघितल्यानंतर ती व्यक्ती सुयोग्य आहे की नाही ह्यासाठी काही विशिष्ट परिमाण असल्यास आपली दिशाभूल टळते अन्यथा त्या व्यक्तीच्या गुण-दोषांवरून आपण त्या व्यक्तीच्या मूळ स्वभावाचा अंदाज बांधू पाहतो जो चुकण्याचीही शक्यता असते आणि आपण निर्णय घाईचा ठरतो. साधारणपणे जी व्यक्ती 1)विचारी 2) संयमी 3)विश्वासू ह्या तीन मुख्य कसोट्यांवर तपासली जाते तीच समंजस, चांगली किंवा मुला-मुलींच्या अपेक्षेनुसार ‘सुयोग्य’ मानता येते. हे तीन महत्त्वाचे मुद्दे आपल्याला आपल्या भावी जोडीदाराचा स्वभाव समजण्यास अनेक अंगांनी सहाय्यकारी ठरतो आणि लग्नासाठी स्थळे बघणाऱ्या तरुणाईने ह्याचा अगदी प्राधान्याने विचार करायला हवा.


आयुष्यामध्ये आपल्याला जोडीदार हवा असतो, ती आपली शारीरिक, भावनिक, कौटुंबिक आणि सामाजिक गरज असते. ह्यातीलप्रत्येक गरजेचे स्वतःचे असे स्वतंत्र महत्त्व आहे आणि ह्यापैकी कुठलीही गरज अपूर्ण राहिल्यास आपल्या ‘सुयोग्य’ जोडीदाराची पोकळी जाणवत राहाते. आपण वरील तीनही गुण कसे महत्त्वाचे आहेत आणि त्यानुसार आपल्याला आपला अपेक्षित जोडीदार कसा निवडता येईल ह्याचा विचार करू. आपलं माणूस विवाहसंस्थेतर्फे  इतर विवाहसंस्थांच्याही सर्व सदस्यांना हे मार्गदर्शन वैयक्तिकरित्या मोफत उपलब्ध असते. 
आपण बघितलेले स्थळ, ती व्यक्ती जोडीदार म्हणून विचारी आहे की नाही ही बाब प्राधान्याने विचारात घ्यावी व तपासावी लागते. मुळात आपण बघत, भेटत असलेल्या व्यक्तीला स्वतःचे असे स्वतंत्र विचार आहेत वा नाहीत ही गोष्टही तितकीच मुद्द्याची! ते विचार योग्य आहेत वा अयोग्य हा भाग निराळा आणि त्यावर प्रत्येकाची मतेही निराळी असू शकतात परंतु आपल्या भावी जोडीदाराला स्वतःचे असे मत असावे ही अपेक्षा अजिबातच गैर नाही. 

त्यावरूनच पुढे आपल्या कुटुंबाच्या आर्थिक आणि भावनिक प्रसंगांमध्ये आपल्या नात्याचा कस लागणार असतो. तो/ती विचारी आहे की नाही हे आपल्याला अगदी सहज साध्या संवादातून देखील लक्षात येऊ शकते. आपण अमुक एका बँकेची सेवा वापरतो, अमुक प्रकारची गाडी/मोबाईल वापरतो, अमुक शहराविषयी-एरियाविषयी किंवा सध्याच्या सामान्य आजूबाजूच्या घडामोडीविषयी बोलताना आपला भावी जोडीदार काय सांगत असतो? त्यामागे त्याने स्वतः काही विचार करून मत बनविले आहे का? की लोक असं म्हणतात, मित्र/घरचे तसं सांगतात ह्यावरून तो/ती अनुमान काढते? अशा सोप्या माहितीवरून आपण ती ‘सुयोग्य’ व्यक्ती विचारी आहे वा नाही हे ठरवू शकतो. लग्नानंतर निर्माण झालेल्या दोन कुटुंबातील अनेक घडामोडीत, प्रसंगात आपल्या जोडीदाराची लक्षणीय भूमिका असू शकते. अर्थात, ह्या गोष्टी पूर्वीही होत्याच पण आज त्यांचा विचार करून निर्णय घेताना आपण भावी आयुष्य अधिक सोपे व संसार अधिक सुखाचा बनवू शकतो. 

संयमी व विश्वासू जोडीदार मिळविण्याचे भाग्य मिळविण्यासाठी ती व्यक्ती अनेक साधारण, छोट्या- छोट्या प्रसंगांमध्ये कसे वागते हे बघितल्यास सहज लक्षात येते. विश्वासाला जपणारी व्यक्ती आपल्या जोडीदाराला, त्याच्या जवळच्या नातेवाइकांना, दोन्ही कुटुंबीयांना कधी संकटात न टाकणारी असेल ह्याची पावतीच देते.


अगदी, सोपे म्हणजे समोरील व्यक्ती भेटण्याची वेळ ठरविताना मोकळा वेळ, निवांत स्थळ किंवा कुटुंबियांची/भेटणाऱ्याची सोय, सुट्टी इ. चा बाबी विचारात घेतो का? कुटुंब काहीसे आधुनिक विचारांची असतील तर भेटण्यापूर्वी फोनवर जनरल प्राथमिक बोलणी करून सर्वांचा वेळ, श्रम इ. गोष्टी वाचवितो का? भेटीतील बोलण्यात कोणत्या मुद्द्यांची चर्चा होते? लग्न ठरविण्यासाठी घाई असणे किंवा अजिबात घाई नसणे ह्या दोन्ही बाबींना काही पार्श्वभूमी आहे का? त्यामागे काही विचार आहे का? स्थळाची ओळख कुणामुळे झाली – नातेवाईक, विवाहसंस्था, मध्यस्थ ह्याविषयी काय बोलणे होते? प्रत्यक्ष चर्चेमध्ये किंवा फोनवर बोलल्या गेलेल्या सर्व गोष्टी आपल्या जोडीदाराकडून पाळल्या जातात का? नसल्यास तो खुल्या मनाने त्याविषयी स्पष्टता करतो का? ह्या वरून त्याची/तिची विश्वासार्हता सहज ध्यानात घेता येते. पुढील संसारात अनेक कठीण प्रसंगात, आर्थिक अडचणींमध्ये, आजारपणांमध्ये, मूलांच्या संगोपानांत, व्यावसायिक आयुष्यात, गुंतवणूकीच्या निर्णयामध्ये, संपत्तीच्या व्यवहारात इ. अनेक ठिकाणी आपल्या जोडीदाराच्या संयमाची परीक्षा होते. तशी ती ह्यापूर्वीही पिढ्यानपिढ्या होत आली आहे. 


पण आजची तरुणाई निश्चितच आपल्या भावी जोडीदाराविषयी, त्याच्या निवडीविषयी अधिक चोखंदळ आणि जागरूक झाली आहे, मुलींचीही उच्च शिक्षणातील दैदिप्यमान वाटचाल त्यांना अधिक सजग बनवीत आहे. आजची स्मार्ट तरुणाई आपल्या पालकांच्या, कुटुंबियांच्या संसारातुनही काय नको आणि त्याऐवजी काय हवे हे पडताळत आहे. आपल्या सुखद भविष्यासाठी केली जाणारी ही विचारांची गुंतवणूक तुम्हाला तुमचं ‘आपलं माणूस’ नक्कीच फायदा मिळवून देईल. आणि सरतेशेवटी आपला जोडीदार विचारी, संयमी व विश्वासू आहे की कसा हे बघून निवडलेला “सुयोग्य” जोडीदार तुम्हाला हक्काचं ‘आपलं माणूस’ बनून साथ देईल, ह्यात शंकाच नाही.

‘विवाहपूर्व समुपदेशन’ ह्या बोजड नावाखाली कधी कधी ह्या सरळ-सोप्या गोष्टीही हजारो रुपयांत विकल्या जातात. जरा विचार केला तर जनरल घटना-प्रसंगातून आपण बरंच काही शिकू शकतो. त्यासाठी प्रत्येक वेळी स्थळं बघितल्यावरच मेंदू कामाला लावायची अगदीच गरज नाही. किंबहुना तोवर आपली बरीच तयारी झालेली असते आणि ‘आपलं माणूस विवाहसंस्थे’सारखी चांगली आणि वैचारिक मार्गदर्शनाची साथ असेल तर आपल्या आयुष्याचा हा रेशमी टप्पा एक आनंदसोहळा बनून जातो. सुखी संसारासाठीची हीच खरी इंव्हेस्टमेंट, नाही का?


आपलं माणूस विवाहसंस्था आपल्या त्वरित शुभ-विवाहाची आणि सुखद सह-जीवनाची कामना करते.



सुयोग्य जोडीदाराच्या निवडीसाठी....
आजच नाव नोंदवा : www.apalamanus.com


ग्राहक सेवा क्रमांक:  98-606-82-967 आणि 738-7171-483
वेळ: स. 10 ते सायं 6 | रविवार सुरु


आमचा ब्लॉग वाचा : http://apalamanusvivahsanstha.blogspot.in/

फेसबुक पेज लाईक करा : https://www.facebook.com/apalamanusvivahsanstha

गुगल ग्रुप जॉईन करा :
https://groups.google.com/forum/#!forum/apalamanus